सोमवार, ३ जून, २०१३

चाळीस मिनिटांचा किल्ला,सतरा तास प्रवास : अर्नाळा किल्ला

अर्नाळा किल्ला

हौसेला मोल नसते हेच खरे. या हौसेपोटी कोण काय करेल सांगता येत नाही. आम्हीही मे महिनातल्या कडक उन्हामुळे संपावर गेलेल्या आमच्या ट्रेकर मंडळींना हौसेने या ट्रेक साठी निमंत्रण दिले. एकंदर ऊन आणि ठिकाण पाहता त्यांनी निमंत्रण आणि मी दोघांनाही धुडकावून लावले.
पण येथे आमची हौस उफाळून आली, आणि  भूषण चा पेटंट "जे येतील त्यांच्या बरोबर, नाही येतील त्यांच्या शिवाय, ट्रेकला जायचेच" असा डायलॉग मारून आम्ही निघालो.

जे होते ते चांगल्यासाठीच होते म्हणतात ना,अगदी तसेच झाले. चाळीस मिनिटाच्या किल्ल्यासाठी तब्बल सतरा तास प्रवास करून मी परत जेव्हा पुण्यात आलो, तेव्हाच ठरवले की, आता यापुढे जरी कदाचित पोर्तुगीजांची सत्ता आली, आणि त्यांनी हा किंवा विरारला दुसरा नवा किल्ला बांधून त्याच्यासाठी "महान(!!) ट्रेकर(!!)" म्हणून मला बोलावले, तरीही मी विरार ला परत पाऊल ठेवणार नाहीये. अगदी त्यांच्या देशाच्या ग्रीन कार्ड चे आमिष दाखवले तरीही नाही. नाही म्हणजे नाहीच :)

दोन महिन्यापूर्वी खांडस ते भीमाशंकर ट्रेक केल्यापासून पुढचे दोन महिने घरातून बाहेरच पडलेलो नव्हतो  भटकंतीसाठी. आता ऊन हि बेक्कार असल्याने जास्त दमवणूक करणारा ट्रेक नको म्हणून मग मोर्चा जलदुर्गांकडे वळवला. म्हणून मग एका दिवसात जाऊन येता येईल अश्या अर्नाळा किल्ला जायचे ठरवले.


ऐतिहासिक संदर्भ : 
चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला अर्नाळा हा जलदुर्ग १५१६ मध्ये गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने बांधला. पोर्तुगीजांनी १५३० साली हा किल्ला जिंकला व नंतर यावर अनेक नवीन बांधकामे केली. सुमारे २०० वर्षांच्या पोर्तुगीज सत्तेनंतर हा किल्ला १७३७ मध्ये मराठ्यांच्या ताब्यात आला. पोर्तुगीजांप्रमाणेच पहिल्या बाजीरावानेही या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. शेवटी १८१७ मध्ये इतर किल्ल्याप्रमाणेच हा किल्ला देखील इंग्रजांच्या ताब्यात गेला.

भौगोलिक संदर्भ :
मुंबई च्या पश्चिम भागातील विरार या स्टेशन पासून जवळपास १० किमी वर अर्नाळा हे गाव आहे. त्याच्या पुढे अर्नाळा नावाच्या लहानशा बेटाच्या वायव्य दिशेस हा जलदुर्ग किल्ला बांधला आहे. वैतरणा नदी ह्या किल्ल्याजवळ समुद्राला मिळत असल्यामुळे खाडीच्या सर्वच प्रदेशावर या किल्ल्यावरून नजर ठेवता येत असे.


गूगल नकाशे वरून घेतलेल्या चित्रात चौकोनी किल्ला दिसत आहे. किल्ल्याच्या बाजूला सध्या बरीच वस्ती वाढली आहे.

किल्ल्याचा नकाशा :
आंतरजालावरून साभार 

बघण्याची ठिकाणे आणि सद्यस्थिती : 
 अर्नाळा गावापासून चालत १०  मिनिटे आपण समुद्र किनारी येतो. तेथून समोरच अर्नाळा बेटाचे  दर्शन होते. अर्नाळा किल्लाला दहा मीटर उंचीची अखंड व मजबूत तटबंदी असून तटबंदीमध्ये असलेले ८ बुरूज किल्ल्याच्या अभेद्यतेची साक्ष देतात. किल्ल्याला एकूण तीन दरवाजे असले तरी मुख्य प्रवेशद्वार उत्तरेकडे आहे. तसेच हाजीअली आणि शहाअली यांची थडगीही आहेत.  किल्ल्याच्या आत त्र्यंबकेश्वराचे व भवानी मातेचे मंदिर आहे. त्र्यंबकेश्वर महादेवाच्या मंदिरासमोरच सुबक बांधणीचे एक अष्टकोनी तळ आहे. याशिवाय किल्ल्यात गोड्यापाण्याच्या विहिरीही आहेत. किल्ल्याच्या सभोवार लोकांची वस्ती असून त्यांची शेतीही आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याकडे जातांना बाहेरच्या बाजूला कालिकामातेचे मंदिर आहे.
पुण्यावरून जाऊन, सोळा सतरा तास प्रवास करून हा चाळीस मिनिटांचा किल्ला पाहण्यात वर्थ नाही असे मला वाटते 

आमचा ट्रेक अनुभव :
नेहमीप्रमाणे सकाळची सिंहगड पकडून कल्याण ला उतरलो. आजचा दिवस काही खास नव्हता बहुतेक. घरातून निघतानाच उशीर झाला, मग (गाडीच्या) जीवाच्या आकांताने धडपड ( घरघर) करीत शिवाजीनगरला पोहोचलो. तेथे पाऊल ठेवले तोच कानांना काही उच्च स्वरातील शब्द ऐकू आले. यानंतर तिकीट काढून कल्याण ला उतरेपर्यंत वेगवेगळी स्टार कास्ट असलेली बरीच भांडणरूपी चलचित्र मी पहिली. 
भूषण भेटला आणि निघालो कोपरला. तेथेही १ तास पुरतील एवढी माणसे तिकीट रांगेत आणि त्यात गाडी ४० मिनिटे लेट.
तेथून निघून उतरलो विरारला. रविवार असून हि एवढी लोक भर उन्हात कुठे भटकत आहेत हे काही उमजेना.कालच भूषण म्हणाला होता की विरार ला खूप गर्दी असते.स्टेशनमधून बाहेर जाऊन बस पकडली.
एव्हाना साडे बारा झाले होते आणि साडे बाराला शेवटची बोट असते असे ऐकले होते, म्हणून तेथून पळतच सुटलो. नशिबाने ती शेवटची बोट दिसली. ती पकडली आणि पुढच्या पंधरा मिनिटात किल्ल्यात पोहोचलो.

आता एक वाजलाच होता म्हणून किनारी उतरून लगेच कालिकामातेचे मंदिर गाठले. तेथे थोडी सावली होती आणि मस्त गार हवा होती. तेथेच जेवण करून घेतले आणि मग वामकुक्षी साठी टेकलो.
 तरतरीत झालो आणि फोटो चालू झाले. बसल्या जागेवरूनच हा पहिला फोटो काढला. पांढरा सिंह पाहून लहानपणीचे ( म्हणजे मी लहान असतानाचे) पेशवे पार्क आठवले. तेथेही पांढरा सिंह होता.( जगाच्या पाठीवर कुठेही जा, एकदातरी जुन्या पुण्याविषयी हळहळ व्यक्त झालीच पाहिजे. :) )


हेच ते कालिकामातेचे मंदिर. स्थानिक लोकांची या देवीवर खूप श्रद्धा आहे. अनेक वादळे व संकटे येतात, कधी बोटी बुडतात, पण हि देवी सगळी संकटे टाळते असे त्याचे विचार जाणवले.


येथे बोटीच्या प्रतिकृतीतच तुळस लावली होती.


 मंदिराच्या आवारातच किल्ल्यातील एक तोफ आणून सिमेंट मध्ये फिक्स केली आहे.

किल्ला म्हटले की तेथे हनुमानाची मूर्ती हि हवीच.


काही मुले तेथे उनाडक्या करीत होती, पण  दूरवर पसरलेली खाडी लक्ष वेधून घेत होती.


आता निघालो किल्ल्याच्या दिशेने.
तटबंदी ला लागून जाणाऱ्या रस्ताने पुढे निघालो. आणि दोन प्रचंड आणि भक्कम अश्या बुरुजांमध्ये कल्पकतेने लपविलेले किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार दृष्टीस पडले.


बाहेरूनच किल्ल्याची तटबंदी, बुरूज आणि समोर विस्तीर्ण खाडी दिसत होती.



थोडे जवळून बघितल्यास त्याच्या अभेद्यतेची जाणीव होते. असे मोठाले दगड येथे बेटावर कसे आणले असावेत?

या प्रवेशद्वारावरच हत्ती आणि सिंह यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.


बरोबर मध्यभागी हा शिलालेख कोरलेला होता. आंतरजालावर त्याचा असा अर्थ सापडला.
'बाजीराव अमात्य सुमती आज्ञापिले शंकर! पाश्चात्त्यासि वधूनि सिंधु उदरी बांधा त्वरे जंजिरा!!'
या शिलालेखावरून हा किल्ला पूर्णपणे बाजीराव पेशव्यांनीच बांधून घेतला असा तर्क करता येतो.


या प्रवेशद्वारातून आत आल्यावर आतून हा मस्त फोटो आला. येथून उजवीकडे अजून एक दरवाजा होता. येथील स्थापत्यकला वसई किल्ल्याशी बरीचशी मिळती जुळती होती.


आत आल्यावरही अनेक ठिकाणी कोरीवकाम आणि कारागिरी केलेली दिसली.

हे कोरीवकाम छतावर केलेले होते.
आता माझ्यासारखा कारागीर असता तर म्हणाला असता की "छतावर 'वर मान' करून कोण बघतंय ? आणि तसेही मान वर करून बघण्याचे असे किती प्रसंग सामान्याच्या आयुष्यात येतात ? काही नको छतावर कोरीवकाम"


याच दारातून आम्ही आत आलो होतो. तेथून डावीकडे वळून वरती तटबंदी वर चढलो.

येथे एक राजवाडा होता असे वाचनात आले. त्याचे भग्न अवशेष दिसत होते.

बघता बघता पहिल्या बुरुजावर आलो. येथे अनेक खंदक खोदलेले दिसत होते. बाहेरून एक दिसणारे खंदक आत बघितले असता तीन मध्ये विभागले होते. किती प्रमाणबद्ध आणि डिटेल काम केले होते बांधणाऱ्या कारागिराने.


येथून एका स्तूपासारखे  काहीतरी दिसले.


 तटबंदी वरून चालत सुटलो. सगळीकडे अख्खा किल्लाभर स्थानिकांनी मासळी सुकवण्यासाठी टाकली होती. त्यावर पाय देऊन जावे लागत होते. हेच घाणेरडे मासे लोक आवडीने खातात.  अरेरे ! मुळात स्वतःचे पोट भरण्यासाठी दुसया सजीवाचा जीव घेणे हे मला पटत नाही. असो. पोटासाठी लोक काही(ही) करू शकतात.
 


आता दुसऱ्या बुरुजावर आलो. येथून किनारपट्टीचे नेत्रसुखद दृश्य पहिले.

  
येथून खाली अमृतेश्वर मंदिर आणि अष्टकोनी तलाव दिसले.


किल्ल्याबाहेरील शेती

 तिसरा बुरूज:

किल्ला चारही बाजूनं पाण्याने वेढला असल्याने सर्व बाजूंनी खाडीच दिसत होती.

येथून तटबंदी वरून खाली जाण्याचा मार्ग होता.

चौथा बुरूज :
 जरा वेळ निवांत टेकलो.

 किल्ला पाहून या बुरुजावरही जायचे होते.

दूरवर नारळ पोफळीची झाडे पसरली होती.



येथेही एक खंदक खोदलेला दिसला, भूषण तेथून आत गेला तर यातून चक्क खाली जाणारी भुयारी वाट होती. कॅमेराचा फ्ल्याश मारत तेथून खाली उतरलो.


या खंदकांमध्येही प्रकाशाची नैसर्गिक व्यवस्था केली होती.

तेथून उतरलो ते डायरेक्ट या दरवाज्यानेच बाहेर ( खाली ) आलो.


किल्ला आता पाहून झाला होता. दर्ग्यात काही गेलो नाही. थोडा वेळ झाडाखाली झोपलो आणि सरळ बाहेर निघालो.
थोड्या अंतरावर किल्ल्यापासून स्वतंत्र असा ’हनुमंत बुरूज’ म्हणून ओळखला जाणारा भक्कम बुरूज आधीपासूनच होता. याची उंची ३६ फूट असून  जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही. बुरजातून फुटलेले झाड पकडून हौशी माणसे जाऊ शकतात. त्याच्या पायथ्याशीही खंदक खोदलेले दिसले पण ते बुजलेले होते.

वसई किल्ल्यातून एका चर्च मधून निघणारा एक भुयारी मार्ग समुद्राखालून या बुरुजाशी येतो असे काही लोकांना त्याच्या पूर्वजांकडून कळले.



येथे एक गावकरी भेटला त्याच्याकडून काही माहिती मिळाली.
सध्या गावात तीन ग्रुप पडलेले असून एक धनिक, एक सरकारी आणि एक खालच्या जातीतील लोक. धनिक लोकांकडे पैसा असल्याने ते गावात राजकारणे करतात. आणि  त्यांच्या विरुद्ध गेले की त्याला गावातून हुसकावून लावतात.
आधी अंधार पडला की गाव शांत होत असे. आता लाइट आली आणि रात्रभर मुलांचे टीव्ही बघणे आणि गाणी लावणे चालू झाले. राम नाईक नावाच्या राजकारण्याने आश्वासन दिल्यावर येथे १ वर्षात येथे लाइट आणली, पण त्यालाही सध्या कोणी विचारत नाही म्हणे.
त्याच्या आजोबांनी सांगितल्याप्रमाणे ते जेव्हा येथे आले तेव्हा गोऱ्या लोकांची (पोर्तुगीजांची) सत्ता होती. गोरी लोक येथे रणगाडे घेऊन यायचे. ( तो रडगाणे घेऊन यायचे असे म्हणाला, आता पोर्तुगीज स्वतःचा देश सोडून इतके  मैल लांब नुसते रडायला का येतील हा प्रश्न मला पडला.पण नंतर कळले.)
आता या बेटावर रणगाडे इतक्या लांबून कसे आणले असतील आणि त्या काळातही ते किती प्रगत असावेत ह्या विचारात मी पडलो.
गावातील दैवत कालिकादेवी गावाला सगळ्या संकटातून वाचवते यावर त्याची श्रद्धा आहे.

आता निघायची वेळ झाली होती. परत बोटीपाशी येऊन थांबलो तर एक बोट आधीच निघून गेली होती. दुसरी  बोट आली आणि बूट न काढताच मी पाण्यातून चालत जाऊन बोटीत घुसलो.


किनारी दोन कावळे मस्त मासळी खाऊन पोट भरल्यामुळे गप्पा टाकत बसले होते.


कित्येक खेकडे आपला शेवटचा श्वास मोजत पडले होते.

हे बगळेबुवा मात्र मस्तपैकी बोटीच्या शिरोभागी बसून ऐटीत प्रवास करत होते. "उडण्याचा पक्ष्यांना पण कधीतरी कंटाळा येत असावा". लगेच पू.ल. आठवले.

काही कारण नसताना अश्या अनेक माशांची जीवनयात्रा संपली होती. याला मारून ( किंवा मरून) काय मिळाले असावे? न ह्याचा खायला उपयोग न कशाला. याचे जीवन माहीत नाही, पण मरण मात्र व्यर्थ गेले. बिचारा !

जाताना बोटीमध्ये जे  मच्छीमार लोक होते त्यांनी खेकडे पकडून आणले होते. त्यात एका बाईला हा मोठा दीड किलोचा असा खेकडा मिळाला होता. त्याच्या नांग्या बांधल्या होत्या. पण तो जिवंत होता. तो हातात घेऊन एक फोटो काढला. याची बाजारभावे किंमत चार हजार होती म्हणे, पण त्या बाईकडून ज्या व्यापाऱ्याने तो विकत घेतला त्याने तो फक्त सातशे रुपयांना घेतला. केवढी तफावत होती.


एक गोष्ट मनात आली, जीवन हे किती वर्सटाईल आहे. वरील सगळे प्राणी/पक्षीच. पण प्रत्येकाच्या जीवनाची वेगवेगळी फेज. सगळ्यात दुर्बल कावळे फक्कड जेवण झाल्यामुळे आनंदी, बगळा ऐटीत, खेकडे जीवनयात्रेच्या शेवटच्या टप्प्यात, माशांनी (विनाकारण)तोडलेला श्वास, आणि सगळ्यात सबल मोठा खेकडा जिवंत असून त्याचे प्रभावी शस्त्र म्हणजे नांग्या बधून ठेवल्याने हतबल आणि पारतंत्र्यात.
दुसऱ्या किनारी पोहोचून किल्ल्याचे शेवटचे दर्शन घेतले. येथूनही तो ३६ फुटी बुरूज दिसत होता.


जाताना परत एक बोट चुकली, मग पुढे जाऊन बस चुकली, दुसरी मिळवून विरार ला गेलो. तेथे तब्बल एक  तास तिकीट रांगेत उभा !, वसई ची शेवटची ट्रेन गेली होती म्हणून पळत ट्रेन पकडली दादरची. तेथे पोहोचलो तर शेवटची सह्याद्री पण गेलेली. 
आठ वाजताची राजकोट-भुवनेश्वर पकडली आणि खऱ्या अर्थाने दिवस वाया गेला. ट्रेन मध्ये सगळी अशक्य माणसे भरली होती. कोण कुठेही बसलेय, कोणाचे पाय कोणालाही लागतायेत. कुठेही फडकी बांधून त्यात मुले झोपलेली. आणि पुण्याला येईपर्यंत ट्रेन मध्ये भांडणे चालूच होती. आजच्या दिवशी मी २०  पेक्षा जास्त  भांडणे पहिली. ओह, केवढा वेळ आहे लोकांना :) 
नंतर देहूरोडला काही तृतीयपंथी ट्रेन मध्ये येऊन लोकांकडून जबरदस्तीने पैसे घेत होते.मी मात्र काही पैसे दिले नाही.

ट्रेन मध्येच सनत जयसूर्याचा श्रीलंकेतील जत्रेत दुरावलेला त्याचा जुळा भाऊ मला दिसला. बिछडा भाई का काय म्हणतात ते. अगदीच सेम होता. त्याला मी म्हंटले की "९६ ला काय झ्याक खेळला रे सनत! कपच आणला त्याने एकट्याने!" तर तो "छुट्टा नाही है" असे बोलला. मग मी म्हणालो की "पण तो वकार युनुस तो बोल्या की, दादर से गाडी लेट हाय!" यावर तो खिडकीतून जो काही थुंकला त्याने तेथील फुलझाडांची पावसाळ्यापर्यंतची पाण्याची सोय झाली असावी. 

आता जवळपास अकरा वाजून गेले होते. कसाऱ्यापाशी ट्रेन ला आग लागल्याने घरचे काळजीने सतत फोन करत होते. साडे अकरा वाजता घरी पोहोचलो. 

किल्ल्याला जाताना बोटीने प्रवास करताना मी बूट काढलेच नव्हते. त्यामुळे पूर्ण बुटात पाणी गेले होते.  आणि तश्याच ओल्या बुटांनी दिवसभर फिरत होतो. घरी येऊन बूट काढले तर मोज्यांचा खतरनाक वास यायला लागला होता. मी तसेच ते खिडकीत ठेवले. आईने मात्र वेळीच प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन ते धुवायला टाकले आणि उभा ( म्हणजे विरारहून पायाचे टळवे टेकतील एवढ्याच जागेत उभा राहून आलेला ) महाराष्ट्र 'देशी अ‍ॅनेस्थेशिया' च्या नवीन शोधला मुकला. 

असो. बाकी, अनुभव बरा होता, पण सोळा तास प्रवास करून तेथे जे काही पहिले ते एवढे वर्थ नव्हते असे वाटले. 

सागर

३ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

very good

chandrashekhar म्हणाले...

सुंदर छायाचित्र आहे समस्त पण अर्नाळा जलदुर्गा प्रवेशद्वावरील ते शिल्प "शरभ" नाही वाटत. आपण त्याबद्दल मझ्या ज्ञानात भर टाकू शकता का ????????

दुर्गवीर प्रतिष्ठाण कार्यकर्ता

जय शिवराय

Manisha म्हणाले...

Chan lekh aahe. Likhan shaili vegali/hatake aahe.. Keep it up.